आशिष कोटकर (वरोरा-भद्रावती प्रतिनिधी) : वरोरा तालुक्यातील शेगाव पोलीस स्टेशन हद्दीतील कोसरसार बीटमधील मकसूर गावात ३३ वर्षीय युवा शेतकरी कवडू शंकर भटकर यांचा जिवंत विद्युत तारेचा करंट लागून संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून गावकऱ्यांमध्ये विविध चर्चांना उधाण आले आहे.
माहितीनुसार, कवडू भटकर हे काल सकाळी सुमारे ११.३० वाजण्याच्या सुमारास “शेतात जातो” असे सांगून घरातून बाहेर पडले होते. मात्र सायंकाळपर्यंत ते घरी परतले नाहीत. बराच वेळ उलटल्यानंतरही संपर्क न झाल्याने कुटुंबीयांनी त्यांचा मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. फोनला रिंग जात होती, मात्र प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे चिंताग्रस्त कुटुंबीयांनी आणि गावकऱ्यांनी शोधाशोध सुरू केली.
सायंकाळी सुमारे ७ वाजता त्यांच्या मालकीच्या शेतात शोध घेतला असता ते जमिनीवर पडलेल्या अवस्थेत आढळले. त्यांच्या एका हातात विद्युत तार पकडलेली होती. ही बाब लक्षात येताच ग्रामस्थांनी तातडीने शेगाव पोलिसांना माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच शेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार योगेंद्रसिंह यादव यांच्या मार्गदर्शनाखाली कोसरसार बीटचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवला.
गावकऱ्यांच्या अंदाजानुसार ही घटना दुपारी सुमारे २ वाजण्याच्या सुमारास घडली असावी. मात्र मृत्यूची नेमकी कारणे अद्याप स्पष्ट झालेली नाहीत. त्यामुळे हा अपघाती मृत्यू आहे की अन्य काही कारण आहे, याबाबत संशय व्यक्त केला जात आहे. गावकऱ्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून सत्य समोर आणण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, शेगाव पोलीस स्टेशनकडून घटनेचा पुढील तपास सुरू असून शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.






















