जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार): तालुकास्तरावर अंतिम फेरीत निवड झालेल्या ग्रामपंचायतीला आज जिल्हास्तरीय मूल्यांकन समितीने भेट देत विविध विकासकामांची पाहणी केली. यावेळी तालुक्यातील पंचायत समिती पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, अधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्रामपंचायतीने स्वच्छता, विकासकामे, डिजिटल सुविधा तसेच विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणीत उल्लेखनीय कामगिरी केल्यामुळे जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविण्यासाठी ग्रामस्थ व पदाधिकाऱ्यांचे प्रयत्न सुरू आहेत. उपस्थित मान्यवरांनी ग्रामपंचायतीच्या कामाचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
मात्र, गावाच्या प्रगतीबरोबरच मूलभूत सुविधांवर अधिक लक्ष देण्याची गरज असल्याचे ग्रामस्थांनी यावेळी व्यक्त केले. गावात आजही नियमित पिण्याच्या पाण्याची समस्या कायम असून अनेक भागात लाईटची अडचण जाणवत आहे. तसेच स्वच्छता, नाले सफाई आणि गावातील इतर मूलभूत सुविधांवर तातडीने काम होणे आवश्यक असल्याचे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले.
‘गावाला पुरस्कार मिळणे ही अभिमानाची बाब असली तरी नागरिकांच्या दैनंदिन समस्यांचे निराकरण होणे अधिक महत्त्वाचे आहे,’ अशी प्रतिक्रिया काही ग्रामस्थांनी दिली.






















