बबनराव नागरे (देऊळगाव राजा प्रतिनिधी ) : आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त जायंट्स वेलफेअर फाउंडेशनद्वारे संचलित जायंट्स सहेली ग्रुप, देऊळगाव राजा यांच्या वतीने महिलांसाठी “महिलांची नवी झेप डिजिटल भारताकडे” तसेच “सोशल मीडियाचे फायदे व नुकसान” या विषयांवर मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सिव्हिल कॉलनी येथील श्री गणपती मंदिर परिसरात ६ मार्च रोजी हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमात प्रा. अश्विनी जाधव मेहेत्रे यांनी महिलांना डिजिटल युगातील संधींबाबत मार्गदर्शन करताना सांगितले की, आजच्या काळात तंत्रज्ञानाचा स्वीकार करणे ही काळाची गरज आहे. महिलांनी नव्या तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून स्वतःच्या प्रगतीबरोबरच समाजाच्या विकासातही महत्त्वपूर्ण योगदान द्यावे. राष्ट्रनिर्मितीत महिलांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून विकसित भारत घडविण्यात त्यांचे योगदान अनन्यसाधारण असल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी त्यांनी महिलांना Artificial Intelligence (एआय) म्हणजे काय हे सोप्या शब्दांत व उदाहरणांसह समजावून सांगितले. आरोग्य, शिक्षण, व्यवसाय आदी क्षेत्रांमध्ये एआयचा कसा उपयोग होऊ शकतो याबाबत सविस्तर माहिती दिली. डिजिटल युगात महिलांनी तंत्रज्ञानाशी जुळवून घेत डिजिटल कौशल्ये आत्मसात करून आत्मनिर्भर बनावे, असे आवाहनही त्यांनी केले.
तसेच डॉ. प्रियंका देशमुख यांनी सोशल मीडियाचे फायदे व नुकसान या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की फेसबुक, व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम यांसारख्या माध्यमांमुळे जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातील व्यक्तींशी त्वरित संवाद साधणे शक्य झाले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून शिक्षण, माहिती, व्यवसायिक संधी तसेच विविध कला-कौशल्यांचे प्रदर्शन करण्याची संधी मिळते. यूट्यूब, इन्स्टाग्राम, फेसबुक यांसारख्या प्लॅटफॉर्मवरून गायन, नृत्य, पाककला, चित्रकला यांसारख्या कलांना प्रसिद्धी मिळू शकते तसेच रोजगाराच्या नव्या संधीही निर्माण होत आहेत.

मात्र सोशल मीडियाचा अतिरेक मानसिक आरोग्यासाठी घातक ठरू शकतो, असेही त्यांनी सांगितले. सोशल मीडियावर होणारी तुलना, ट्रोलिंग आणि ‘लाईक्स’च्या मागे लागण्याची प्रवृत्ती यामुळे नैराश्य, चिंता आणि न्यूनगंड निर्माण होण्याची शक्यता असल्याने त्याचा वापर मर्यादित व जबाबदारीने करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या कार्यक्रमात उपस्थित महिलांनी विषयाबद्दल उत्सुकता व्यक्त करत एआय आणि डिजिटल तंत्रज्ञानाविषयी अधिक जाणून घेण्याची तयारी दर्शवली.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ग्रुपच्या अध्यक्षा किरण अंबुस्कर तसेच लता हरकुट, राखी काबरा, जया जैन, सविता पाटील, मालती कायंदे, शशी भाला, ज्योती आगेवाल, तरुणा भारूका आणि सुनीता शिंदे यांनी विशेष परिश्रम घेतले.






















