Times of Maharashtra Desk, Pune: राज्यातील महापालिकेच्या निवडणुकीचा निकाल काल जाहीर झाला असला, तरी संपूर्ण राज्याचं लक्ष वेधून घेतलं ते पुण्यातील कोंढवा प्रभाग क्रमांक 19 क या जागेनं. कारण, या प्रभागात राजकारणातील अनुभव, दांडगा जनसंपर्क आणि संघटनबळ असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुणे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांचा पराभव करत एका नवख्या चेहऱ्याने राजकीय भूकंप घडवून आणला.
या नवख्या पण धाडसी उमेदवाराचं नाव आहे – काशीफ सय्यद
अनेक वर्षांपासून पुणे शहराच्या राजकारणात सक्रिय असलेले, प्रभावशाली नेते म्हणून ओळख असलेले साईनाथ बाबर यांना हरवणं सोपं नव्हतं. मात्र, कोणताही मोठा राजकीय वारसा नसताना, कमी संसाधनांतून निवडणूक लढवणाऱ्या काशीफ सय्यद यांनी मतदारांच्या विश्वासावर विजय मिळवत ‘जायंट किलर’ ठरण्याचा मान पटकावला.
काशीफ सय्यद यांनी प्रचारादरम्यान स्थानिक प्रश्न, नागरिकांच्या दैनंदिन अडचणी, पाणी, रस्ते, स्वच्छता आणि तरुणांचे प्रश्न थेट मांडले. “नेते नव्हे, सेवक” या भूमिकेतून त्यांनी मतदारांशी साधलेला थेट संवादच त्यांच्या विजयाचा कणा ठरला, अशी चर्चा कोंढव्यात रंगली आहे.
या निकालानंतर कोंढवा प्रभागातच नव्हे, तर संपूर्ण पुणे शहराच्या राजकारणात नव्या नेतृत्वाच्या उदयाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. अनुभवावर मात करत जनतेच्या विश्वासाने मिळवलेला हा विजय भविष्यातील राजकारणाची दिशा बदलणारा ठरेल का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.






















