Times of Maharashtra Desk: महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजना महायुतीला विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या मोठ्या विजयामुळे सतत चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. महिला कल्याणाशी संबंधित अनेक मुद्दे सभागृहात उपस्थित झाल्यावर ही योजना वारंवार चर्चेत येत . मंगळवारी झालेल्या हिवाळी अधिवेशनातही अशीच परिस्थिती निर्माण झाली; मात्र या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेचा अनावश्यक उल्लेख होत असल्याने नाराजी व्यक्त केली आहे.
भाजप आमदार आणि मुख्यमंत्री यांचे पूर्वीचे स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार यांनी त्यांच्या मतदारसंघातील अवैध दारू विक्रीचा मुद्दा सभागृहात उपस्थित केला. पवार म्हणाले, “अवैध दारू ही आमच्या लाडक्या बहिणींची सर्वात मोठी समस्या आहे. महिला सतत याबाबत तक्रारी करत असतात. त्यामुळे यावर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे.” त्यांनी पुढे म्हटले की, विधानसभा अध्यक्षांनी यापूर्वी संबंधित विभागांना निर्देश दिले होते; मात्र त्याची अंमलबजावणी झालेली नाही.
या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री फडणवीस काहीसे चिडल्याचे दिसून आले. त्यांनी थेट पवारांना सुनावले, “प्रत्येक मुद्दा लाडकी बहीण योजनेशी जोडू नका. लाडक्या बहिणींच्या विरोधात जाण्यासारखी कोणतीही भाषा वापरू नका; अन्यथा घरी बसावे लागेल.” फडणवीस यांनी स्पष्ट केले की लाडकी बहीण योजना सुरूच राहणार आहे, तिच्या निधीत कोणताही बदल होणार नाही आणि तिची तुलना इतर कोणत्याही योजनेशी करता येणार नाही.तसेच, मुख्यमंत्री म्हणाले की विधानसभा अध्यक्षांनी केलेल्या निर्देशांची अंमलबजावणी झाली नसेल तर ती आता तातडीने केली जाईल. सरकार महिला सुरक्षेबाबत, तसेच अवैध दारूविरोधात ठोस पावले उचलणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.






















