म्हसवड प्रतिनिधी महेश कांबळे : माण तालुक्यातील सर्वात मोठे शहर असलेल्या म्हसवड येथे पालिकेच्या ढिसाळ व तोकड्या नियोजनामुळे पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. नागरिकांना तब्बल ७ ते ८ दिवसांच्या अंतराने पाणीपुरवठा होत असल्याने जनतेत तीव्र नाराजी पसरली आहे.
या पार्श्वभूमीवर शिवसेना शेतकरी सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष कृषिरत्न प्रा. विश्वंभर बाबर यांनी सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्याकडे निवेदन देत तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.
प्रा. बाबर यांनी निवेदनात म्हटले आहे की, उन्हाळ्याच्या दिवसांत पाण्याची गरज वाढलेली असताना पाणीपुरवठा अत्यल्प आणि अनियमित होत आहे. शहरातील अनेक भागांना ७ ते ८ दिवसांनीच पाणी मिळत असून, पुरवठ्याचा कालावधीही विस्कळीत होत आहे. जुन्या पाईपलाईनमधील गळतीमुळेही परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे.
म्हसवड शहरासाठी सुमारे ८० कोटी रुपयांची नवीन पाणीपुरवठा योजना तीन वर्षांपूर्वी मंजूर झाली असली तरी काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे. उपलाइनचे काम बहुतांश पूर्ण झाले असले तरी मुख्य पाईपलाईन अपूर्ण आहे. तसेच काही ठिकाणी तांत्रिक त्रुटींमुळे पाणीपुरवठ्यावर विपरीत परिणाम होत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले.
ठेकेदाराची मनमानी व अयोग्य व्यवस्थापनामुळे नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असल्याचा आरोपही त्यांनी केला. केवळ खर्चाची बिले काढण्यापेक्षा जनतेचे हित महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जुन्या योजनेसोबतच नवीन नळ पाणीपुरवठा योजना तातडीने सुरू करून नागरिकांना नियमित पाणीपुरवठा करावा, अशी मागणी प्रा. बाबर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.






















