Times Of Maharashtra Desk : मुंबई महानगरपालिकेच्या महापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असताना, भाजपनं महापौरपदासाठी मराठी उमेदवार दिल्यामुळे आम्ही कोणताही अपशकून करणार नाही, अशी स्पष्ट भूमिका शिवसेना ठाकरे गटानं घेतली आहे. गटनेत्या किशोरी पेडणेकर यांनी याबाबत प्रतिक्रिया देत सांगितलं की, आम्हाला आकड्यांची गणित मान्य आहेत आणि त्या वास्तवाला स्वीकारूनच आम्ही पुढची भूमिका ठरवली आहे.
किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, शिवसेना ठाकरे गट सक्षम विरोधी पक्ष म्हणून जबाबदारी पार पाडणार आहे. कुठल्याही प्रकारच्या दबावाला किंवा आमिषाला बळी न पडता, विरोधी पक्षाची भूमिका प्रामाणिकपणे आणि ठामपणे निभावली जाईल, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. प्रत्येक नगरसेवक आपल्या विभागातील प्रश्न सभागृहात सक्षमपणे मांडेल आणि मुंबईकरांच्या मुद्द्यांसाठी आवाज उठवेल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
विरोधी पक्षाची भूमिका आमच्यासाठी नवीन नाही
विरोधी पक्षाची जबाबदारी पार पाडण्याबाबत बोलताना पेडणेकर यांनी स्पष्ट केलं की, ही भूमिका शिवसेना ठाकरे गटासाठी नवीन नाही. सत्तेत असतानाही अनेक वेळा आम्हाला विरोधी पक्षासारखीच भूमिका घ्यावी लागली होती, आणि आता तर आम्ही अधिक जबाबदारीने तीच भूमिका बजावणार आहोत, असं त्यांनी सांगितलं. केवळ एखाद्या व्यक्तीपुरती नव्हे, तर संपूर्ण पक्ष एकसंधपणे आणि शिस्तबद्ध काम करेल, यावर त्यांनी भर दिला.
भाजपकडून रितू तावडे यांची महापौरपदासाठी अधिकृत घोषणा
दरम्यान, भाजपकडून मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी रितू तावडे यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी रितू तावडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं. महापौरपदासाठी रितू तावडे आणि शीतल गंभीर यांच्या नावांची चर्चा सुरू होती, मात्र अखेर रितू तावडे यांनी बाजी मारली आहे. यंदा मुंबई महापौरपद सर्वसाधारण महिला गटासाठी राखीव आहे.
उपमहापौरपद शिंदे गटाकडे
मुंबई मनपामध्ये उपमहापौरपद शिवसेना शिंदे गटाकडे जाणार असून, संजय शंकर घाडी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. शिंदे गटाचे नेते राहुल शेवाळे यांनी स्पष्ट केलं की, संजय घाडी पुढील सव्वा वर्षे उपमहापौर म्हणून कार्यभार सांभाळणार आहेत.
मी स्वतःला मुंबईची सेवक मानते -रितू तावडे
नावाची घोषणा होताच रितू तावडे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं की, महापौरपद ही जबाबदारी असून मी स्वतःला मुंबईची सेवक मानते. सभागृहाची गरिमा जपत, पक्षभेद विसरून सर्व नगरसेवकांनी एकत्र येत मुंबईच्या हितासाठी निर्मळ आणि प्रामाणिक काम करावं, हीच माझी अपेक्षा असल्याचं त्यांनी नमूद केलं.
मुंबई महानगरपालिकेची महापौर निवडणूक ११ फेब्रुवारी रोजी होणार असून, रितू तावडे या भाजपच्या मुंबईतील पहिल्या महिला महापौर ठरणार आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईच्या राजकारणात नव्या समीकरणांची आणि तीव्र चर्चांची सुरुवात झाली आहे.






















