धीरज महांगरे (पुणे शहर प्रतिनिधी) : हडपसर-मांजरी रोडवरील गोपाळपट्टी येथील उड्डाणपुलावरील गंभीर त्रुटी आणि पुलाखाली साचलेल्या कचऱ्याबाबत टाईम्स ऑफ महाराष्ट्रने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले आहे. बातमी प्रकाशित होताच संबंधित विभागाने तातडीने दखल घेत उड्डाणपुलावरील अपूर्ण कामे हाती घेतली असून, पुलाखाली व सर्विस रोडवरील कचरा देखील साफ करण्यात आला आहे.

गोपाळपट्टी येथील उड्डाणपुलावर सुरुवातीच्या व उतरतानाच्या भागातील कठडे अपूर्ण असल्याने वारंवार अपघात होत असल्याचा मुद्दा टाईम्स ऑफ महाराष्ट्रने ठळकपणे मांडला होता. यानंतर पुणे महानगरपालिका प्रशासनाने तत्काळ कामे मार्गी लावाव्यात असे नागरिकांच म्हणणं आहे.
तसेच पुलाखाली साचलेला कचरा, घाण व दुर्गंधीमुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला होता. या वृत्ताची दखल घेत प्रशासनाने पुलाखालील संपूर्ण परिसर साफ केला असून, सर्विस रोडही स्वच्छ करण्यात आला आहे.
ही समस्या सर्वप्रथम सामाजिक कार्यकर्ते सागर साळुंखे यांनी समोर आणली होती. नागरिकांच्या तक्रारींना टाईम्स ऑफ महाराष्ट्रने आवाज दिल्यामुळेच हा सकारात्मक बदल घडून आल्याची प्रतिक्रिया स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत.



















