Times of Maharashtra Desk: ओला आणि उबर यांसारख्या खासगी टॅक्सी सेवांना पर्याय म्हणून केंद्र सरकारच्या पाठबळावर ‘भारत टॅक्सी’ (Bharat Taxi) ही नवी, सहकारी तत्त्वावर आधारित टॅक्सी सेवा सुरू होण्याची शक्यता आहे. नववर्षाच्या मुहूर्तावर ही सेवा दिल्लीमध्ये १ जानेवारी २०२६ पासून सुरू होणार असल्याची माहिती आहे. या उपक्रमामुळे खासगी कंपन्यांकडून आकारल्या जाणाऱ्या जादा कमिशनला आळा बसेल आणि चालक तसेच प्रवासी-दोघांनाही थेट फायदा होईल, असा दावा करण्यात येत आहे.
भारत टॅक्सी हे सहकारी मॉडेलवर आधारित असल्याने चालक हे केवळ कर्मचारी नसून सेवेचे भागीदार व मालक असतील. कंपनीकडून कोणतेही कमिशन घेतले जाणार नसल्यामुळे चालकांना त्यांच्या कमाईचा मोठा हिस्सा मिळणार आहे. त्यामुळे चालकांचे आर्थिक स्थैर्य वाढण्यास मदत होणार आहे.
प्रवाशांसाठी स्वस्त व पारदर्शक भाडे
या सेवेमध्ये ‘सर्ज प्राइसिंग’ असणार नाही. म्हणजेच गर्दीच्या वेळी भाडे अचानक वाढणार नाही. भाडे निश्चित, पारदर्शक आणि तुलनेने स्वस्त ठेवण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याने प्रवाशांना वाढीव दरांचा फटका बसणार नाही. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी ग्राहक सेवा आणि थेट सुरक्षा यांना प्राथमिकता देण्यात आली आहे . डीजीलॉकर, उमंग यांसारख्या सरकारी डिजिटल प्लॅटफॉर्म्सशी जोडलेले असेल.
सध्याच्या सेवांमधील अडचणींवर उपाय
सध्याच्या टॅक्सी सेवांमध्ये चालकांना जादा कमिशन, कमी उत्पन्न आणि सामाजिक सुरक्षेचा अभाव जाणवतो. तर प्रवाशांना वाढलेले दर, राइड रद्द होणे आणि सेवेच्या गुणवत्तेबाबत तक्रारींचा सामना करावा लागतो. ‘भारत टॅक्सी’ या सर्व समस्या कमी करण्याचा प्रयत्न करणार आहे.
सहकार से समृद्धी या ध्येयाशी सुसंगतपणे चालकांना सक्षम करणे, त्यांना योग्य व स्थिर उत्पन्न मिळवून देणे आणि प्रवाशांना स्वस्त, सुरक्षित व विश्वासार्ह वाहतूक सुविधा उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
भारतामधील अनेक दशलक्षी शहरे, वेगाने विस्तारत असलेले आयटी हब, तसेच राज्यस्तरीय, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांमुळे वाढत चाललेली कामगारांची संख्या लक्षात घेता, सरकारकडून स्वतःची अशी एक विश्वासार्ह टॅक्सी सेवा सुरू करण्यात येत आहे. याचा लाभ येत्या काळात चालक, प्रवासी आणि शहरी वाहतूक व्यवस्थेला मोठ्या प्रमाणावर होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.






















